ह्या वर्षीच्या पावसाळ्यात झाडांची लागवड सुरु करायचा बेत आहे. त्या दिशेने पहिले पाउल म्हणुन राईत उगवलेले गचपण आणि खुरटी झुडपे साफ करुन घेतली. शंकरनाना आणि निवृत्तींदादांना कंत्राट दिले. त्यांनी सगळे रान तोडुन मोकळे केले. मोठी झाडे, आंबे, घळी भोवतालच्या दाटीला अजिबात हात लावला नाही. तळाच्या जाळ्या मोकळ्या केल्या.
शेजारचा उस तोडुन व्हायचा होता म्हणुन जाळायसाठी थांबले होते. तर शेजारच्या शेतक-यानेच त्याचा उस पेटवला आणि राबाबरोबर आंब्याची झाडे पण पेटली.
हा एक प्रश्नच झाला. अश्या आगींपासुन कसं वाचवायचं राईला?
ह्या वर्षी कडेकडेने फुलवृक्ष लावायचा बेत आहे. पेल्टोफोरम आणि तामण सारखे दर ऋतुत फुलणारे, बहावा, गुलमोहोरासारखे उन्हाळी, बुच, चाफ्यासारखी सुगंधी. बघुया काय काय जमते ते.
पाउस पडायच्या आधी खड्डे घेउन, शेणखत पडायला पाहिजे.




